सिद्धेश रेडेकरचा अपघाती मृत्यू – हेल्मेट असूनही नाही वाचला जीव, पण खरे कारण वेगळेच!

सिद्धेश रेडेकर यांचा अपघातात मृत्यू हेल्मेट असूनही झाला. पण खरं कारण आहे – वेळेत उपचार न मिळणं, मदतीला पुढे न येणारे नागरिक आणि सरकारी प्रक्रियेतील दिरंगाई.

सिद्धेशच्या मृत्यूमागचं खरं कारण – फक्त अपघात नाही, तर समाजाची उदासीनता!

कोल्हापूर, प्रतिनिधी:
अजरा-आंबोली मार्गावर दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सिद्धेश रेडेकर (वय २५, रा. माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बातम्यांमध्ये फक्त ७० हजार रुपयांच्या हेल्मेटचा उल्लेख होत असला, तरी खरं कारण वेगळंच आहे – वेळेत उपचार न मिळणं आणि लोकांनी मदत न करणं

खरं काय घडलं?

  • सिद्धेश यांना अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत केली नाही.

  • सरकारी रुग्णालयात (PHC अजरा) त्यांना नेण्यात आलं, पण तिथे तातडीची सुविधा नव्हती.

  • रुग्णाला दुसऱ्या खाजगी रुग्णालयात पोहोचवायला २ तास लागले.

  • आणि शेवटी, हा वेळ वाया गेला आणि एक निरागस जीव संपला.

जबाबदार कोण?

  • मदत न करणारे नागरिक?

  • वेळखाऊ सरकारी यंत्रणा?

  • की फक्त दुचाकी व हेल्मेटच्या किमतीवर लक्ष केंद्रित करणारे मीडिया चॅनेल्स?

अपघातानंतर पहिली ६० मिनिटं – “गोल्डन अवर”

या पहिल्या ६० मिनिटांत योग्य उपचार मिळाल्यास मृत्यू टाळता येतो. पण आपण त्या वेळेत काय करतो? फोटो काढतो? व्हिडिओ करतो? की रुग्णवाहन बोलवतो?

आणि आता सोशल मीडियावर काय होतंय?

सगळे फक्त बाइक एवढ्या लाखांची होती, हेल्मेट एवढ्या हजारांचं होतं – याच गोष्टींचा उदोउदो करत आहेत. पण या मुलाच्या आईवडिलांच्या काळजाला काय झालं असेल? या सगळ्यातून त्यांना किती वेदना होत असतील, इकडे लक्षच नाही आहे.

वाचकांसाठी आवाहन:

  • अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करा. रुग्णवाहन, पोलीस यांना तत्काळ कॉल करा.

  • कायद्यानुसार मदत करणाऱ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही.

  • मीडिया संस्थांनी फक्त वस्तूंच्या किमतीकडे लक्ष न देता, खरं कारण आणि उपाय यावर भर द्यावा.

2 thoughts on “सिद्धेश रेडेकरचा अपघाती मृत्यू – हेल्मेट असूनही नाही वाचला जीव, पण खरे कारण वेगळेच!”

  1. अगदी बरोबर. माणसाने माणुसकीने वागावं, इतकी माफक अपेक्षा आहे. आमच्या सिद्धेश ला accident नंतर मदत करण्यासाठी माणूसकी कुणी दाखवली नाही. तो गेल्यावर news channels, social media वाले, comments post करणारे लोकं यांनी माणूसकी सोडली. आणि प्रशासन, पोलिस, आरोग्य विभाग यांच्या बद्दल तर काय व्यक्त व्हावं हेच कळेनास झालंय.

    अरे माणसा, माणसा, कधी व्हशील रे तू माणूस.

    निषेध निषेध निषेध. आमच्या सिद्धूच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांचा धिक्कार करते मी

    Reply
  2. एखाद्याचा अपघात झाला तरी बरेच लोक मदतीला पुढे येत नाहीत, कारणं :

    1. भीती – पोलिस, कोर्टकचेऱ्या यामध्ये अडकण्याची भीती खूप लोकांच्या मनात असते. त्यांना वाटतं, “मदत केली तर आपणच अडचणीत येऊ.” आणि काही वेळा असा अनुभव काहीजणांना येतोही…

    2. जबाबदारी झटकणं – काही लोकं विचार करतात की “कोणीतरी दुसरं येईल मदतीला,” म्हणजेच “bystander effect” होतो.

    3. असंवेदनशीलता – काही वेळा लोक इतके आपल्या कामात व्यस्त असतात की इतरांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात.

    4. माहितीचा अभाव – अपघात झाल्यावर काय करावं, कुठे संपर्क करावा, हेच माहीत नसल्यामुळे काहीजण गोंधळून काहीच करत नाहीत.

    यासाठी आपण, सामाजिक संस्था, पोलिस खाते तसेच प्रशासनाने ही जनजागृतीसाठी काही गोष्टी करू शकतो:

    1. सोशल मीडिया कॅम्पेन – अपघातग्रस्ताला मदत करणे ही माणुसकीची जबाबदारी आहे, हे सांगणारी पोस्ट्स, रील्स, स्टोरीज तयार करायला हव्यात.

    2. ‘Good Samaritan Law’ ची माहिती – भारतात असा कायदा आहे की, अपघातात मदत करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होत नाही. याबद्दल खूप लोकांना माहितीच नाही.

    3. स्थानिक पातळीवर वर्कशॉप्स – रस्ते सुरक्षा आणि प्राथमिक उपचार याबद्दल वर्कशॉप्स घेता येतील. शाळा, कॉलेज, कंपनी, किंवा सोसायट्यांमध्ये ही माहिती देता येईल.

    4. ‘First Responder’ टीम तयार करणे – आपल्या परिसरात काही स्वयंसेवकांची टीम तयार करून, अपघाताच्या वेळी त्वरीत प्रतिसाद देणं शक्य होईल.

    5. पोस्टर आणि स्टिकर्स – “अपघात पाहिलात? मदत करा!” अशा संदेशांसह बसस्टॉप, रस्ते, ट्रॅफिक सिग्नल्स, आणि दुकानांवर पोस्टर लावता येतील.

    6. अपघातस्थळी लगेच ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची यंत्रणा

    7. रुग्णालये कोणतीही अडथळा न आणता प्रथम उपचार द्यावीत

    8. मदत करणाऱ्या नागरिकांना संरक्षण आणि प्रोत्साहन मिळावं

    असे केल्यास सिद्धेश सारखी तरुण, हुशार, मनमिळाऊ, होतकरू व उद्योग करू इच्छिणारे तरुण अपघाती अकाली मृत्यू पावत असतील, तर त्याचा थेट परिणाम देशाच्या मानवी संसाधनावर, उत्पादनक्षमतेवर आणि GDP वर तसेच देशाच्या प्रगतीसाठीही होतो.

    सिद्धेश भावा,
    मी तुला वैयक्तिकरित्या ओळखत नसलो, तरी तुझ्या वडिलांचे कष्ट, त्यांची प्रामाणिकता, तुझ्यावरचं प्रेम आणि तुझ्याबद्दलचे शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक स्वप्न याची मला कल्पना आहे.

    तुझ्या अकाली जाण्याने माझ्याही हृदयाचा ठोका चुकला आहे. खरंच, असं व्हायला नको होतं. तुझ्या जाण्यावर बोलावं, यासाठी शब्दच अपुरे आहेत.

    तुझ्या आई-वडिलांना, कुटुंबाला, या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. आणि याचसोबत, समाजामध्ये यामधून काहीतरी सकारात्मक प्रबोधन व्हावं, ही माझी मनापासूनची इच्छा आहे.

    कारण तुझ्या बाबतीत उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे तुला प्राण गमवावे लागले, हे अस्वस्थ करणारं आणि असह्य आहे.

    जर भविष्यात अशी वेळ कोणावर आली, तर त्या व्यक्तीला तात्काळ उपचार मिळावेत, त्यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस पावलं उचलली गेली, तरच ती तुझ्या जाण्याला खरी श्रद्धांजली ठरेल — असं मी मानतो.

    मन अत्यंत जड झालं आहे… अशा दु:खद प्रसंगी तुला माझ्या अंत:करणातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो…

    Reply

Leave a comment