10 HABITS of world’s most SUCCESSFUL PEOPLE | यशस्वी लोकांच्या १० सवयी

चला जाणून घेऊया, जगातील सर्वात यशस्वी लोकांच्या १० सवयी (10 HABITS of world’s most SUCCESSFUL PEOPLE) आयुष्यात यशस्वी सर्वांना व्हायचं असतं. अनेक स्वप्नं पूर्ण करायची असतात. त्यासाठी काही जण अतोनात  मेहनत ही घेतात पण वाट्याला आलेल्या अपयशाने खचून जातात आणि पुन्हा नव्याने उभं राहणं त्यांना जमत नाही. मात्र यशस्वी तेच होतात जे अपयशातून शिकतात आणि पुन्हा उभे राहतात. त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. यशस्वी असलेले लोक फक्त त्यांच्या कामात फक्त मेहनत घेत नाही तर त्यांनी वैयक्तिक आयुष्यात स्वतः काही सवयी लावून घेतलेल्या असतात. या सवयी त्यांच्या यशाचं मोठं कारण असतं. कोणत्या अश्या सवयी आहेत की ज्यामुळे यशस्वी लोक इतरांपेक्षा वेगळे कसे ठरतात ? चला पाहुयात…

10 HABITS of world's most SUCCESSFUL PEOPLE
10 HABITS of world’s most SUCCESSFUL PEOPLE

यशस्वी लोक सबबी सांगत नाहीत

यशस्वी लोक स्वयंशिस्तीला खूप महत्त्व देतात. सेल्फ डिसीप्लिनमुळे त्यांना यशस्वी होण्यासाठी  खूप मदत होते. ते त्यांच्या कामाशी खूप प्रामाणिक असतात त्यामुळे ते कधीच कोणत्या सबबी सांगत नाही. आलेल्या समस्यांना धाडसाने सामोरे जातात. थोर विचारवंत ब्रायन ट्रेसी यांच्या मते,  कोणतेही काम करा किंवा करू नका. पण सबबी सांगणे सोडा. जेव्हा तुम्ही सबबी सांगता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीपासून मागे राहता.

ध्येय निश्चिती

यशस्वी लोक त्यांचे ध्येय खूप विचार करून निवडतात. जर हॉटेल व्यवसायात  ध्येय निश्चित करायचं आहे तर त्याबाबत ते हुरळून न जाता त्याचा नफा आणि तोटा दोन्हींचा विचार करतात. त्याला लागणार वेळ, त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक बळ आपल्याकडे पुरेसे आहे का ? नसेल तर ते उभे करता येईल का ? आणि ते कसे करावे ? याबाबत ते आधी अभ्यास करतात. ध्येय निश्चित करताना कोणत्याही मोहाला बळी न पडता सारासार विचार करून निवडलेले ध्येय हे जास्त काळ टिकून राहते. हे यशस्वी होण्याचे एक कारण आहे.

वेळेचे नियोजन

यशस्वी माणसं वेळ कधीच वाया जाऊ देत नाही. त्यांना आयुष्यातल्या प्रत्येक सेकंदाचे महत्त्व माहीत असते. दिवस भरात ठरवलेली नित्याची कामं ते अर्धवट सोडून देत नाहीत. वेळेचा अपव्यय करणे त्यांना जमत नाही. वेळेचं महत्व माहीत असलेली माणसं क्षुल्लक ठिकाणी वेळ वाया न घालवता तोच वेळ ते स्वतःला देतात. त्यापेक्षा अजून जास्त स्वतः मध्ये सुधारणा कश्या प्रकारे होऊ शकते या कडे त्यांचे लक्ष्य केंद्रित असते.

सतत शिकत राहणे

असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. तो प्रत्येक वेळी आलेल्या अनुभवातून, भेटलेल्या माणसांकडून काही न काही शिकत असतो. शिकण्याची वृत्ती माणसाला सर्वार्थाने ज्ञान मिळवण्यात मदत करते. यशस्वी लोक सतत नवनवीन कौशल्ये शिकण्यावर भर देत असतात. शिकण्याची वृत्ती त्यांना त्यांच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने जाण्यास मदत करते. बौद्धिक दृष्ट्या त्यांना सक्षम करते.

भावनांवर असलेले नियंत्रण

सामान्यतः काल्पनिक विश्वात रमायला सगळ्यांना आवडतं. स्वप्नं पाहणं गरजेचं आहे पण फक्त स्वप्नं पाहून काहीच साध्य होत नाही. स्वप्नं सत्यात यायला वास्तवात राहून कार्य करणे गरजेचे असते. मग ते कधी कधी मनाविरुद्ध करावे लागणार असले तरी त्याची तयारी असावी लागते. करियर असो किंवा वैयक्तिक आयुष्य  ही माणसे भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे टाळतात. परिस्थिती नुसार प्रसंगी कठोर निर्णय घेताना होणाऱ्या त्रासाला ही मंडळी न घाबरता सामोरे जातात. मन हे खूप अस्थिर आहे. मनाची चंचलता नियंत्रण आणणं कठीण असलं तरी अशक्य नसते. मनात येणाऱ्या असंख्य नकारात्मक विचारांना आपल्यावर हावी होऊ न देणे हे कणखर माणसाचे लक्षण आहे. मनावर नियंत्रण मिळवणे एका दिवसात होत नसले तरी सातत्याने प्रयत्न केल्यास मनावर नियंत्रण मिळवणे काही प्रमाणात शक्य होते.

नेटवर्किंग पॉवर

आपल्या करियर संबंधित किंवा इतर क्षेत्रातील होतकरु आणि प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच विचारवंत यांच्या सानिध्यात राहणे पसंत करणारे माणसे आयुष्यात खूप पुढे जातात. आयुष्यात संगत खूप महत्त्वाची ठरते.तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात राहिलात तर तुमच्यावर चांगल्या विचारांचा प्रभाव पडतो. जो तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण ठरतो. यशस्वी माणसे परिस्थिती आणि वास्तविक जगाचा विचार करत आयुष्याचे निर्णय घेणे पसंत करतात.

परोपकारी वृत्ती

ज्ञान हे देण्याची भावना आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. आपल्याला मिळालेले ज्ञान वाटण्यात ही माणसे धन्यता मानतात. त्यांना त्यांच्या ज्ञानावर किंवा कौशल्याचा गर्व नसतो. कठीण परिस्थितीत आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. त्याचप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीची जाणीव असल्या कारणाने ते दुसऱ्यांच्या वाईट वेळेत त्यांना मदत करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. आपण आपल्या देशासाठी, समाजासाठी ज्यांनी आजवर आपल्या हितासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल ते कायम सकारात्मक विचार करत असतात. आपण आपल्या देशाचे नाव कसे मोठे करू शकतो यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशी माणसे निस्वार्थीपणे समाजाची सेवा करण्यास कायम तत्पर असतात.

आरोग्याची काळजी

यशस्वी लोक वेळ तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्याला आपली खरी संपत्ती मानत असून आरोग्याची काळजी ते घेत असतात. कठीण परिस्थितीत खचून न जाता आलेल्या समस्यांना धीराने सामोरे जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ असणे आवश्यक असते. अशी माणसे आपल्या आरोग्याची हेळसांड करू देत नाही. त्यामुळे त्यांना करियर किंवा वैयक्तिक आयुष्य येणाऱ्या समस्यांना तोंड देण्याची मानसिकता तयार झालेली असते. अशी माणसे चांगला-वाईट बदल खूप धीराने स्वीकारतात. माझ्याच बाबतीत असं वाईट का झालं ? यापेक्षा जे झालं त्याचा स्वीकार करत चुकांमधून शिकत राहतात. ही माणसे त्यांच्या आयुष्यात खुप नम्र असतात. त्यामुळे ते इतरांना आदर देतात आणि तोच आदर त्यांना समाजाकडून मिळत राहतो. आलेल्या वाईट परिस्थितीत संयमाने गोष्टी हाताळणे ही सवय त्यांना इतरांपेक्षा यशस्वी होण्यासाठी मदत करत असते. व्यायाम, मेडिटेशन यामुळे मानसिकरित्या सक्षम राहणे सोपे होते.

जवाबदारी स्वीकारणे

मिळालेल्या यशाची आणि आणि अपयशाची जवाबदारी स्वतः वर घेण्यासाठी ही माणसे नेहमी तयार असतात. अपयशाच्या भीतीने ते जवाबदारी झटकत नाही. ते जोखीम स्वीकारतात. आपल्या मेहनतीच्या बळावर हवं ते मिळवण्यासाठी वाटेल ते करताना यात चुकीचं काही होणार नाही याची खबरदारी घेणे यांना चांगले जमते. त्यामुळे ही माणसे समाजात कायम उठून दिसतात. एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.समाजात यांना इतरांकडून खूप मानाचे स्थान दिले जाते. सर्वसमावेशकता यांच्या अंगी असल्याने अशी माणसे जास्त लोकप्रिय ठरतात. निर्णय घेण्याची क्षमता, प्रसंगी कठोरपणे वागणे हे यशस्वी लोकांमध्ये कायम दिसून येते.

उत्पनाचे अनेक मार्ग

वाचनाने माणसाच्या बौद्धिक कक्षा रुंदावल्या जातात.स्वतः ला आणि जवळच्या माणसांना वेळ देणे.  शक्य तितकं संयमी राहणं, कमीत ताण तणावाखाली असणे हे यशस्वी होण्याची मुख्य पायरी आहे. आपल्या कामात कायम सातत्य टिकवून ठेवणे तसेच एखादे अचानकपणे येणाऱ्या संकटामुळे आपले जास्तीत जास्त नुकसान टळेल याकरिता तुमच्याकडे प्लॅन बी तयार असणे गरजेचे असते. यशस्वी माणसे आपल्या पैशांची नको तिथे उलाढाल करत नाही. तसेच ते योग्य कारणासाठी पैसे खर्च करायला हात आखडता घेत ही नाही. त्यांना आपल्या यशामागे असलेल्या मेहनतीचे भान असते त्यामुळे ते त्यांच्या अनूभवातून आर्थिक दृष्ट्या साक्षर होत जातात. भविष्याच्या तरतुदीसाठी ते पैश्यांची गुंतवणूक योग्य रीतीने करतात.चांगले कर्म करत राहणे. स्पर्धेच्या युगात झटपट यश सर्वांना हवे असते. ते नाही मिळाले की अनेक जण डिप्रेशनची शिकार होतात, असे न करता स्वतः प्रेम करणे, स्वतः वरचा विश्वास कायम ठेवणे हे गुण अंगी असले की शून्यातून विश्व निर्माण करता येते. हीच हिंमत यशस्वी झालेल्या माणसांमध्ये असल्या कारणाने ते इतरांपेक्षा खूप वेगळे दिसून येतात.

वेळ, संयम, सातत्य, कठोर परिश्रम , सतत नवनवीन शिकण्याची वृत्ती ही यशाची गुरुकिल्ली आहे. एका दिवसात माणसाचं यश दिसत असलं तरी त्यामागे असलेले कष्ट खूप दिवस सातत्याने सुरू असतात. कोणती ही चांगली सवय लावताना त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात. करावंसं न वाटणं, झेपत नाही ,जमत नाही असं वाटणं स्वाभाविक असतं पण त्याच्यावर मात करून एक एक आणि हळू हळू चांगल्या सवयी लावण्यात यश आले की आपण आज जिथे आहोत तिथून चार पाऊले आयुष्यात पुढे जात असतो. जगाशी स्पर्धा करण्याआधी आपण आपल्या आयुष्यात एक एक पाऊल हळू हळू पुढे जातोय. रोज नवं काहीतरी शिकतोय याचा जेव्हा आनंद घ्यायला जमेल तेव्हा आयुष्य खूप सोपं होऊन जातं. म्हणूच आयुष्यात यशस्वी होण्याकरिता मेहनत आणि संयमी वृत्ती माणसाला यशस्वी करते.

 

Leave a comment